सोलापूर - पवित्र रमजान महिन्यानिमित्त शहरात ठिकठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन केले जात आहे. मात्र, बुधवारी 18 मार्च रोजी सोलापूर शहरातील सोशल कॉलेजच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीत नियोजनाचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळाले. शेकडोच्या संख्येने आलेल्या रोजदारांना साधे पाणी आणि खजूरही वेळेवर न मिळाल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
हाजी फारूक शाब्दी यांच्या वतीने या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी 6:39 च्या सुमारास उपवास सोडण्यासाठी (इफ्तार) मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव मैदानावर जमले होते. मात्र, ऐन इफ्तारच्या वेळी तिथे पिण्याचे पाणी किंवा जेवणाच्या प्लेट्स उपलब्ध नव्हत्या. उपस्थित रोजदारांसाठी केलेले नियोजन 'शून्य' असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत होते.
इफ्तारची वेळ होऊनही आयोजकांकडून कोणतीही व्यवस्था न झाल्याने, अनेक रोजदारांना नाईलाजास्तव बाहेरून स्वतःच्या पैशाने पाण्याची बाटली आणि खजूर विकत आणावे लागले. काही बांधवांनी तर जेवणाची व्यवस्था नसल्याने तिथे थांबण्यापेक्षा उपाशीपोटी घरी जाऊन जेवण करणे पसंत केले.
एकीकडे रोजदार बांधव पाण्यासाठी आणि जेवणासाठी वणवण करत असताना, दुसरीकडे या कार्यक्रमाचे आयोजक हाजी फारूक शाब्दी हे मात्र कार्यकर्त्यांसह फोटो काढण्यात आणि प्रसिद्धी मिळवण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले. पाहुण्यांच्या सोयीपेक्षा कॅमेऱ्यासमोर पोझ देण्यालाच अधिक महत्त्व दिले जात असल्याने उपस्थित नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती.

0 Comments